भाई परमानंद
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लंडन येथील वास्तव्याने ज्या अनेक लोकांच्या मनात स्वदेशप्रीतीची ज्योत प्रज्वलित झाली त्यातील एक भाई परमानंद. भाई परमानंद यांचा जन्म पंजाबच्या चाकवाल येथे नोव्हेंबर १८७५ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले तर उच्च शिक्षण लाहोर येथे झाले. पुढे लाहोरलाच त्यांनी आर्य समाजाचा प्रसार केला आणि प्राध्यापक म्हणून नोकरी केली. नंतर त्यांना आर्य समाजाच्या प्रसारासाठी दक्षिण आफ्रिका येथे पाठविण्यात आले. आपल्या व्याख्यानाच्या कौशल्याने त्यांनी तेथील लोकांना मोहीत केले. काही काळ दक्षिण आफ्रिकेत घालवून भाई परमानंद पुढे लंडनला गेले.
त्यावेळी लंडनमध्ये पं. श्यामजी कृष्ण वर्मा भारतीय मुलांसाठी भारत भवन नावाची संस्था चालवीत. त्या संस्थेतच वीर सावरकर, लाला हरदयाल वगैरे थोर क्रांतीकारक राहत होते. त्यांच्यासह भाई परमानंद यांच्या चर्चा नेहमीच होत. त्यातुनच भाई परमानंद यांना देशस्थितीची खरी कल्प्ना आली. १९०८ साली भाई लाहोर येथे परत गेल्यावर त्यांच्यावर गुप्तहेर सतत लक्ष ठेवून असत. त्यांची जुनी प्राध्यापकाची नोकरीही त्यांना परत मिळाली नाही. मग भाई भगतसिंग यांचे वडील सरदार किशनसिंग यांच्या घरी राहू लागले. संशयावरून सरकारने घराची झडती घेतली तेव्हा त्या घरात बॉंब मॅन्युअल सापडले. त्यामुळे भाई परमानंद यांना अटक करण्यात आली. पण लौकरच रु. १५,०००/-च्या जामिनावर आणि ३ वर्षे सार्वजनिक कार्यात भाग न घेण्याच्या अटीवर त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यांच्यावरील या बंदीच्या काळात त्यांनी अमेरिकेत राहून वैद्यकीय पदवी प्राप्त करण्याचे ठरविले. १९१३ साली भाई परमानंद यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून आपली पदवी संपादन केली.
त्यावेळी अमेरिकेत लाला हरदयाल गदर पार्टी स्थापन करण्याच्या तयारीत होते. लालाजींच्या आग्रहाखातर भाई परमानंद यांनी लाहोर येथेच राहून पुढील कामे करण्याचे निश्चीत केले. भाई परमानंद यांचे लाला हरदयाल आदी लोकांशी असलेले संबंध सरकारच्या ध्यानात आले. त्यांच्या घराच्या वरच्यावर झडत्या घेण्यात येऊ लागल्या. पण त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा कधी सापडला नाही.
व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर दिल्ली येथे बॉंब फेकण्यात आला. या कामी पकडण्यात आलेले एक आरोपी भाई बालमुकुंद हे भाई परमानंद यांचे चुलत भाऊ होते. गदर पार्टीचे काम, लालाजींशी परिचय, चुलत भावाची अटक या सगळ्या गोष्टी जोडून, प्रत्यक्षात एकही पुरावा नसतांनाही भाई परमानंद यांना अटक करून त्यांच्यावरही खटला भरण्यात आला आणि फाशीची शिक्षा देण्यात आली. केवळ संशयावरून फाशीची शिक्षा होणारे भाई पहिले आणि शेवटचे क्रांतीकारक. त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, त्यांना अंदमान येथे पाठविण्यात आले. या शिक्षेच्या विरुद्ध जन प्रक्षोभ वाढू लागताच सन १९२० साली भाईंची शिक्षेतून सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेनंतर भाई परमानंद यांनी आमरण हिंदू महासभेचे कार्य केले. ८ डिसेंबर १९४७ या दिवशी भाई परमानंद यांनी आपला देह ठेवला.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.